लग्नासाठी आले होते, देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; दुचाकी-बसच्या भीषण अपघातात तिघे ठार

बोदवड तालुक्यातील (Bodwad Taluka) मनुर बु. येथील नवरदेवाकडील वऱ्हाड मंडळी पिंपळगाव खु. येथे आली होती. त्यानंतर नागेश्वर महादेव मंदिरात देवदर्शनास जात असताना पिंपळगाव व सुसरी शिवारात दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात झाला.

वरणगाव : बोदवड तालुक्यातील (Bodwad Taluka) मनुर बु. येथील नवरदेवाकडील वऱ्हाड मंडळी पिंपळगाव खु. येथे आली होती. त्यानंतर नागेश्वर महादेव मंदिरात देवदर्शनास जात असताना पिंपळगाव व सुसरी शिवारात दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघे ठार झाले. या घटनेनंतर विवाह मंडपात एकच शोककळा पसरली.

याबाबतची माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील मनुर बु. येथील मुरलीधर शेळके यांच्या राहुल या मुलाचे पिंपळगाव खु. येथे आज लग्न होते. विवाह मुहूर्त असल्याने वऱ्हाडमंडळी दुपारी बाराच्या सुमारास विवाहस्थळी पोहोचली होती. त्यानंतर शेळके परिवारातील सचिन राजेंद्र शेळके (२६) हा त्याचे चुलते विजय जगन्नाथ शेळके यांना वरणगाव येथील नागेश्वर महादेव मंदिरात देवदर्शन घेण्यासाठी दोन मित्रासह जातो, असे सांगून बाहेर पडले. हे तिघे दुचाकीवरून मंदिराकडे जात असताना वरणगावकडून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच विवाह मंडपात एकच आक्रोश केला

दरम्यान, नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मयत भागवत याच्या पश्चात पत्नी एक मुलगी व एक मुलगा आहे तर जितेंद्र चावरे यास पत्नी, एक मुलगा व सचिन हा अविवाहित आहे.

चंद्रकांत पाटील यांची रुग्णालयात धाव

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकात पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांची विचारपूस करत धीर दिला.