
सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.
श्रीगोंदा : राज्यातील सरकार हे धूळ फेक करून रेडे कापणे ज्योतिषी गंडा दोरी अंधश्रद्धा वाढवत आहे. यांना जबाबदारीचे भान नाही. यांना सत्तेची नशा, मस्ती, धुंदी चढली आहे. सत्तेतील मंत्री प्रवक्ते रोजच बेताल वक्तव्य करीत आहेत. तर राज्यपालही राष्ट्रपुरुषांचा अपमान करीत आहेत. कायदा सुव्यवस्थेची ऐसे तैसे करणाऱ्या या गद्दार सरकारचे आत्ता काही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.
शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्याच्या खरिपाचे पिके वाया गेली तर रब्बी पिकातही अडचणी आल्या असून, त्यातच भर म्हणुन खाते, औषधे, बी- बीयाने डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तू महागाईने शेतकरी व सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यातच कोरोना नंतर गोवर, जनावरांना लंपी आजाराने गोवसले आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेतला परंतु नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे ऐवजी विमा कंपन्या ऑफिस बंद करून गायब झाले आहेत. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तोंडी सांगतात विज बिल भरू नका मात्र लेखी आदेश काढत नाहीत. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करत आहेत. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अशी सध्या परिस्थिती आहे.
राज्यात सहा महिन्यापूर्वी शिंदे फडवणीस सरकार आले. चाळीस दिवस दोघेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. कॅबिनेट बैठकही दोघेच घेत होते. चाळीस दिवसानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार केला. तेही बिनकामाचे मंत्री केले. सरकार हे राज्याचे असते ते कोणत्याही पक्षाचे नसते. जी कामे पूर्वीचे मंजूर आहेत ते पूर्ण करायचे असतात. मुंबई -पुणे स्व बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार असताना मंजूर केला होता. तो सरकार गेल्यानंतर आम्ही पूर्ण केला. तर समृद्धी महामार्ग आघाडी आम्ही आल्यानंतर आम्ही त्याला निधी दिला परंतु हे सरकार पूर्वीचे काम बंद करून नवीन निर्णय घेतात व सरकार विरोधात बोलेल त्याला ईडी बीडीची भीती दाखवून कारण नसतानाही जेलमध्ये टाकतात. असे या सरकारला वठणीवर आणण्यासाठी येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
बबनराव पाचपुते सध्या आजारपणाचे सोंग घेतायेत
राहुल जगताप म्हणाले, भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी चाळीस वर्षे सत्ता उपभोगली ते सध्या आजारपणाचे सोंग घेत आहेत. पक्षाच्या कार्यक्रमात भाषण बाजी करतात मात्र विकास कामांच्या बाबतीत ब्रश शब्दही काढत नाहीत. स्व. शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप हे आजारी असताना त्यांची टिंगल टवाळी करत होते. मग आत्ता तालुक्याची रस्ते वीज पाणी याबाबत काहीच का बोलत नाहीत तसेच तालुक्यातील अनेकांची घरे फोडली मात्र हे इथेच खेळावे लागते अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांचे घरही आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात चुलत भाऊ उभे राहून त्यांचेही घर फुटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी प्रस्तावित केले तर या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार,राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती व पणन मंडळाचे संचालक बाळासाहेब नहाटा, कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती राहुल जगताप, कुकडीचे उपाध्यक्ष विवेक पवार, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सेवा संस्थेचे चेअरमन विजय कुलथे, युवा नेते शरद नवले, मेजर बापूराव निंभोरे, विश्वास थोरात, संभाजी देवीकर, ऋषिकेश गायकवाड, अमोल देशमुख, कल्याणी लोखंडे,सरपंच मीना सकट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वबळाची भाषा करू नका
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, विधानसभा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र बसुनच निर्णय घेणार मागील विधानसभेला घनश्याम शेलार हे अवघ्या २४०० मतांनी पराभूत झाले. स्वबळाची भाषा करू नका अवकात असेल तर लढा पण हारल्यानंतर गाठ आहे, यामुळे डोक शांत ठेवूनच येणाऱ्या निवडणुका लढा असे अजित पवार यांनी सांगितले.