
धान पिकाला खताची मात्रा देताना 22 ऑगस्ट रोजी देसाईगंज तालुक्यातील चोप येथील मोरेश्वर मारुती मुंडले (वय 52) हे अचानक बांधित कोसळून मृत्यूमुखी पडले. डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का पत्नी मिनाक्षीला सहन झाला नाही. या धक्क्याने ती बेशुद्ध पडली.
देसाईगंज : धान पिकाला खताची मात्रा देताना 22 ऑगस्ट रोजी देसाईगंज तालुक्यातील चोप येथील मोरेश्वर मारुती मुंडले (वय 52) हे अचानक बांधित कोसळून मृत्यूमुखी पडले. डोळ्यादेखत पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का पत्नी मिनाक्षीला सहन झाला नाही. या धक्क्याने ती बेशुद्ध पडली. तेव्हापासून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारारम्यान तिचाही शनिवारी (दि.2) दुपारी 1 वाजता मृत्यू झाला.
मोरेश्वर व मिनाक्षी दोघेही 22 ऑगस्ट रोजी धान पिकाला खत देण्यासाठी शेतात गेले होते. काही काळ पिकाला खत देऊन झाल्यानंतर अचानक मोरेश्वर मुंडले यांना भोवळ आली. ते बांधित कोसळले. मुंडले यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या धक्क्याने मिनाक्षी बेशुद्ध पडल्या. बेशुद्धावस्थेतच त्यांना ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
येथे त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच पती मोरेश्वर मुंडले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालल्याने मिनाक्षी यांना नागपूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. पाच दिवसांपूर्वीच मेंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र, प्रकृती खालावतच चालली होती. अखेर मिनाक्षी यांचा शनिवारी दुपारी 1 वाजता मृत्यू झाला. दहा दिवसाच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.