मुंबईचा कायापालट करण्यासाठी गती वाढवा- देवेंद्र फडणवीस

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पुर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गृहनिर्माण विभागाशी संबधित विविध विषयांचा आढावा

मुंबई: गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते . या वेळी  गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, एम एम आर डी ए चे महानगर आयुक्त एस श्रीनिवास , बृहनमुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळ चे मुख्य अधिकारी योगेश म्हसे,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे, इमारत दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरूण डोंगरे, मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी प्रशांत बुरूडे, उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले ,गृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील . म्हाडा किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याच्याशी संबंधित सर्व सामान्य जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

लोककल्याणासाठी हे शासन कार्यरत असून गृहनिर्माण विभागाचे निर्णय हे कोणत्याही राजकीय दबावाखाली घेतले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी . कामकाजात सुसुत्रता आणुन अधिकाधिक पारदर्शकता वाढविण्यावर भर देण्यात यावा असेही ते म्हणाले.
पुढील काही काळातच दृष्य स्वरूपातील बदल झाले पाहिजेत यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य शासनातर्फे केले जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई मंडळाने काढलेल्या “सारसंग्रह” या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी झालेल्या सादरीकरणातील प्रमुख मुद्दे

* समुह विकासाच्या योजना म्हाडा मार्फत राहविणार.
* बिडीडी चाळीचे काम वेगाने व्हावे यासाठीचा आढावा
* धोरणात्मक निर्णय घेऊन लोकांना मोठ्या प्रमाणात सदनिका मिळतील यावर लक्ष केंद्रीत करणार
* गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात चर्चा
* ठरवलेल्या जागांवरचे काम पुर्ण करणे तसेच नव्या बांधकामात गिरणी कामगारांसाठी लाॅटरी काढणार.
* एस आर ए च्या बंद पडलेल्या ६८ योजना खासगी विकासकाकडून काढून म्हाडा मार्फत विकसीत करणार.

* बॅंकामधे किंवा अन्य न्यायिक कारणांनी रखडलेल्या योजनांना पुन्हा सुरू करणार
* एस आर ए योजनांमधील रहिवाश्यांचे थकीत भाडे आणि संभाव्य भाडे देता यावे यासाठीची योजना आनणार.
* कमाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव सादर करणार
* धारावी पुनर्विकासासाठी निविदा काढणार