मिरा भाईंदर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली; महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे आले यश

मिरा भाईंदर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

    भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १३० वरून ७७ निर्देशांकावर आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

    निर्देशांक सुधारल्यामुळे शहरातील हवा चांगली असल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. मिरा भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश दिले होते. हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्रभाग अधिकारी यांनी आरएमसी प्लांटला भेट देऊन स्थळ पाहणी करून नियमांचे उल्लंघन न होण्याबाबत प्लांट धारकांना नोटिसा दिल्या होत्या.

    तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी व आरएमसी प्लांटधारकांनी मिस्ट स्प्रे यंत्रणा बसविणे, साईटवरून बाहेर येणाऱ्या गाड्यांचे टायर धुणारी यंत्रणा बसविणे, ग्रीन नेटचा वापर करणे व डेब्रिज वाहून नेणाऱ्या गाड्या या बंदिस्त राहतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

    उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई

    घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दैनंदिन साफसफाई करताना धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी मेकॅनिकल स्विपिंग मशीनचा वापर करणे, उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करणे, डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर प्रक्रिया करताना हवा प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घेणे. बंदिस्त गाडीतून कचऱ्याची वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रयत्नांमुळे मिरा भाईंदर शहराचा एक्यूआय १३० वरून ७७ वर येऊन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.