रात्रपाळीत अतिरिक्त 15 घंटागाड्या कार्यरत; दिवाळीत शहर स्वच्छ राहण्यासाठी नियोजन

दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित मनपासाठी (Nashik Corporation) नेहमी डोकेदुखी ठरते. त्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त 15 घंटागाड्या सुरू केल्या आहेत.

    नाशिक : दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित मनपासाठी (Nashik Corporation) नेहमी डोकेदुखी ठरते. त्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त 15 घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून शहरातील बाजारपेठांच्या परिसरातून दररोज सरासरी 12 टन अतिरिक्त कचरा संकलित केला जात असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

    व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का होईना कारवाई सुरू झाली आहे. सहाही विभागांतील चारही घंटागाडी ठेकेदारांना प्रशासनातर्फे नोटिसा बजावल्या होत्या. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ची बिरूदावली मिरवणाऱ्या महापालिकेने घंटागाडीवर शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, केंद्राच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत अव्वल येण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही.

    घंटागाडी योजना राबविली जात असली तरी झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच बाजारपेठांच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट स्वच्छ शहर स्पर्धेतील मनपाच्या क्रमवारीत होणाऱ्या घसरणीस कारणीभूत ठरले आहेत. मात्र, प्रशासन सातत्याने घंटागाडी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने नेमके दोषी कोण यावर कोणीही चर्चा करत नाही.

    दिवाळीनिमित्त बाजारपेठांच्या परिसरात होणाऱ्या अतिरिक्त कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रांत कचरा संकलन सुरू केले आहे. त्यासाठी सहाही विभागांत आवश्यकतेनुसार १५ अतिरिक्त घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.