नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, दोघांचा मृत्यू; तिघेजण जखमी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. शनिवारी पहाटे दरीपुलाजवळ भरधाव ट्रकने बस, टेम्पो, मोटारीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत.

    पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. शनिवारी पहाटे दरीपुलाजवळ भरधाव ट्रकने बस, टेम्पो, मोटारीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत.

    विशालकुमार नाविक (वय २२), शाहनवाज झुल्फीकार मुन्शी (वय ३०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. विशाल ट्रकचालक आहे. शाहनवाज टेम्पो चालक आहे. अपघातात सुभाष इंदलकर, पूजा बागल, जियालल निसार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

    मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलापासून काही अंतरावर असलेल्या जांभुळवाडी दरी पुलावरुन पहाटे पावणेचारच्या सुमारास भरधाव वेगाने अवजड ट्रक (कंटेनर) निघाला होता. दरी पुलापासून नवले पुलापर्यंत तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. अपघातात ट्रकचालक विशाल आणि टेम्पोचालक शाहनवाज यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलातील अधिकारी प्रभाकर उमराटकर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जवानांनी ट्रकमध्ये असलेल्या दोघांना बाहेर काढले. दोघेजण गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर काही काळ बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांना अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

    गंभीर दुर्घटना टळली…

    ट्रकच्या धडकने बाह्यवळण मार्गावरील वीजेचा खांब वाकला होता. खांब साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झुकल्याने बसची त्याला धडक बसली. अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. विद्युत पुरवठा सुरु असल्याने तातडीने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. विजेचा खांब महामार्ग पोलिसांनी कापला. बाह्यवळण मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांमधील ऑईल, डिझेल सांडल्याने रस्ता निसराड झाला होता. जवानांनी माती टाकून रस्ता अर्धा तासात खुला केला. ट्रक आणि टेम्पोतील मदतनीसांनी (क्लिनर) उड्या मारल्याने ते बचावले, असे अग्निशमन दलातील अधिकारी प्रभाकर उमराटकर यांनी सांगितले.