सावरकर सांगा कुणाचे, यावरुन ठाकरे आणि शिंदे-भाजपात जुंपली, रणजीत सावरकरांनी टोचले संजय राऊतांचे कान, स्पष्टच म्हणाले…

सावरकर हे कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी, सावरकर हे एका ठाकरे गटाचे नाहीत, असा रणजीत सावरकरांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, यावरुन बरेच राजकारण रंगले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. तर दिल्लीत शरद पवारांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत. तसेच राऊतांनी सावरकरांशी भाजप व RSS चा संबंध नसल्याची टिका संजय राऊतांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी प्रकरणात उडी घेतली आहे.

काय म्हणाले रणजीत सावरकर?

सावरकर हे कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी, सावरकर हे एका ठाकरे गटाचे नाहीत, असा रणजीत सावरकरांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. दरम्यान, सावरकरांवरचा वाद दुर्दैवी आहे, राहुल गांधी हे सावरकर यांचा वापर करत आहेत, मुस्लिम आपल्या पाठीशी येतील म्हणून हा प्रयत्न आहे, राष्ट्रभक्तीचा असा उपयोग करणे गंभीर आहे, असा आरोप रणजीत सावरकर यांनी केला. मविआ सरकार असतेवेळी सावरकर स्मारकात जयंत टिळक अध्यक्ष होते, ते काँग्रेसमध्ये होते, ज्यावेळी सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण झालं त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट मागितली, कारवाई मागणी केली पण झाली नाही. असे रणजीत सावरकर यांनी सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत?

स्वातंत्र्यसंग्रामात भाजपा व आरएसएस कुठे होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, आम्ही सावरकर जगलो आहोत, जगत आहोत, त्यामुळं भाजप व शिंदे गटाने आम्हाला सावरकारांबद्दल शिकवू नये. तसेच सावरकरांशी भाजपा व आरएसएसचा संबंध काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारत, भाजपावर टिका केली. काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी  सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.