सेनेला तडीपार करुन मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

    मुंबई – आता आमचे ठरले असून मुंबई पालिकेत बदल अटळ आहे. शिवसेनेला तडीपार करून पालिकेत भाजपाचा महापौर बसवणार. शिवसेना सामना शेलारांशी आहे, असे म्हणत त्यांना शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

    मुंबईत भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली. त्यांना तडीपार करण्याचे काम आम्ही करणार. पावसाचे दिवस असल्याने आजच सर्व विषयावर मी बोलणार नाही. शिवसेना मुंबईत केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. शिवसेना खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडचे काम, मेट्रो-३ च्या माध्यमातून कारशेडमध्ये केलेला अहंकार, मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे.

    मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की, गेल्या २५ वर्षांत मुंबईबाबत तुम्ही जे चित्र तुम्ही डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल आणि ते मुंबईकरांना सुपूर्त करेल.आम्हाला मुंबईकरांचेही आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचे ठरले आहे. तसेच हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी असल्याचेही त्यांनी म्हटले.