
मुंबई : धनगर समाजाचा एसटी संवर्गात समावेश करावा, यासाठी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगरच्या चौंडी येथे उपोषण सुरु आहे. यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन आंदोलकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यातच आज सरकारच्या वतीने आरक्षणप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कुठलाही तोडगा निघाला नसल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी सांगितलं.
लोकशाही पद्धतीने आमचे आंदोलन सुरूच
सकारात्मक भावना दाखवत ठोस निर्णय येथून मागे घेण्यात आला नाही. आता तरी अंमलबजावणी होणार नसेल तर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. सरकारने दाखवलेले पर्याय आणि इतर राज्यांच्या धनगर आरक्षणावर अभ्यास करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे अंमलबजावणीसाठी आम्ही आमचे लोकशाही पद्धतीने आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे यशवंत सेनेचे बाळासाहेब दोलतडे यांनी सांगितले.
मात्र आम्ही उपोषणावर ठाम
दोलतडे म्हणाले की, या सरकारने आणखी वेळ मागितला आहे. मात्र आम्ही उपोषणावर ठाम आहोत. बैठकीत आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही. दोन-तीन राज्यांचे अहवाल घेण्यासाठी दोन तीन महिने जातील, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र ठोस निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
तीन ठिकाणी आंदोलन सुरु
दरम्यान सरकार सकारात्मक असलं तरी रिझल्ट काही नाही. नुसत बोलून काही होत नाही. तीन ठिकाणी आंदोलन सुरु आहे. १७ दिवस झाले तरी सरकारला जाग आली नाही. आजही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता गावोगावी आंदोलन सुरु होईल. धनगर समाजाचं आंदोलन अंमलबजावणीशिवाय थांबणार नसल्याचं बाळासाहेब दोलतडे यांनी स्पष्ट केलं.