बिपरजॉय चक्रीवादळाचा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी दिसला परिणाम, भरतीचं पाणी थेट शिरलं दुकानात

गणपतीपुळे इथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे गणपतीपुळे येथील समुद्राचे पाणी अचानक चौपाटीच्या जवळ असलेल्या दुकानांमध्ये शिरलं.

    रत्नागिरी: बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biparjoy) समुद्राला भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी याचा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे भरतीचं (High Tide In Ganpatipule) पाणी थेट किनाऱ्यावर असलेल्या दुकानांमध्ये घुसलं आहे. परिणामी दुकानदारांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकही उपस्थित होते. समुद्राच्या मोठ्या भरतीचा फटका गणपतीपुळे (Ganpatipule)समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आज शुक्रवारीही हायटाईडचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. (Ratnagiri)

    रत्नागिरीतील गणपतीपुळे इथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे गणपतीपुळे येथील समुद्राचे पाणी अचानक चौपाटीच्या जवळ असलेल्या दुकानांमध्ये शिरलं. यामध्ये काही पर्यटकांचं सामान वाहून गेलं. दुकानांमधून काही वस्तू वाहून गेल्या आहेत. समुद्राचे पाणी गणपतीपुळे येथील श्री गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आलं होतं. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलू शकतात. गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

    गणपतीपुळेमध्ये चक्रीवादळाचा परिणाम
    गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर नेहमीच पर्यटकांनी मोठी गर्दी असते. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही किनाऱ्यावरती पाहायला मिळेल असा इशारा आधीच हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे. मात्र हा धोका लक्षात घेऊन गणपतीपुळे चौपाटीवर असलेल्या दुकानदारांनी आपली दुकानं उचलली आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड उपस्थित आहेत. पर्यटकांनीही समुद्रात जाऊ नये, असाही सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे.

    महाराष्ट्र आणि गुजरातला चक्रीवादळाचा धोका
    बिपरजॉय चक्रीवादळ हे 48 तासांत आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे धोकादायक परिस्थिती पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रातही हायअलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.