
लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपची सत्ता कायम राहील. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे रविवारी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. विकास, प्रगती, दरडोई उत्पन्न यात महाराष्ट्र मागे पडत आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपची सत्ता कायम राहील. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग येथे रविवारी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यातील मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला. शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे. अशीही कडवट टीका राणे यांनी केली.
सागरी अतिक्रमणाचा धोका वाढलेल्या देवबाग किनारपट्टीवर अत्यावश्यक ठिकाणी त्वरीत बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली. ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटींचा खासदार निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. या बंधारा उभारणी कामाचे भूमिपूजन रविवारी नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मोहन कुबल, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दाजी सावजी, फादर संजय, भटजी व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी देवबाग ग्रामस्थांच्या वतीने नारायण राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देवबाग गावच्या शिवसेना सरपंच यांचे पती मनोज खोबरेकर यांनीही नारायण राणे यांचे विशेष स्वागत केले.
यावेळी बोलताना भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे म्हणाले, राणे साहेबांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकारी यांनी खासदार निधीतुन होणाऱ्या बंधारा उभारणी कामास एका मिनिटात मंजुरी दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी दाखवलेली तत्परता आमदार वैभव नाईक यांना आठ वर्षात दाखवता आली नाही. आठ वर्षात बंधारे बांधले नाहीत मात्र राणे साहेबांनी बंधाऱ्यासाठी एक कोटी निधी देताच बंधारे मी आणले म्हणून भूमिपूजने सुरू केली. राणे साहेबांनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही. अशी टीका निलेश राणे यांनी केली
कोरोना अगोदर केलेल्या कामांचे भूमिपूजन आमदार करतो. या आमदाराला विधानसभेत कोण ओळखत नाही. यापूर्वीचे इथले आमदार विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे. आणि आता कोण आमदार ? हे चित्र बदलले पाहिजे. आठ वर्षात मतदारसंघात काही मिळाले नाही. सरकारी पैसे कधीतरी येतात आणि कामे होतात. यापलीकडे आमदाराचे काम नाही. अशी टीका निलेश राणे यांनी केली.
२०२४ ला महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विकासकामे भाजपच्या माध्यमातून झाली आणि यापुढेही होतच राहतील. असा ठाम विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.