छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र – नाना पटोले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) गुनगाण गाण्याच्या नादात त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी करून महाराज आता जुने आदर्श झाले असून, गडकरी नवे आदर्श आहेत असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला. त्यानंतर भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली.

    मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून, भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) गुनगाण गाण्याच्या नादात त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी करून महाराज आता जुने आदर्श झाले असून, गडकरी नवे आदर्श आहेत असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला. त्यानंतर भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा जावई शोध लावला. एवढ्यावरच हे थांबले नाही तर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.

    याआधी छिंदम नावाच्या भाजपाच्या नेत्यांनेही असेच दिवे लावले होते. यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्वजण भारतीय जनता पक्षाचेच आहेत. महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्ये होत असताना या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करून कारवाई करणे अपेक्षित होते, पण भारतीय जनता पक्षाने तसे काहीही केले नाही उलट सारवासारव करण्यात आली. भारतीय जनता पक्ष नितिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवतांचा अपमान कदापी सहन करणार नाही व भाजपाच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.