
देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील नीट परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय.
सांगली: सांगलीत (Sangli News) नीट परीक्षेदरम्यान (Neet Exam) एका परीक्षा केंद्रावर भयानक प्रकार घडला आहे. कॉपी टाळण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून परीक्षा द्यायला लावण्यात आली. उमेदवारांनी तशी तक्रार केली आहे. त्यानंतर पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे.
देशभरामध्ये 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील नीट परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले, असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय. या परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना देखील कपडे खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे. परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पालकांचा संताप
दरम्यान घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं मत पालकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा प्रकारची तपासणी करून विद्यार्थ्यांना विशेषत: मुलींना उलटे कपडे घालायला लावणं हे कितपत योग्य आहे?, ते कोणत्या चौकटीत बसतं? शिवाय कपडे बदलताना मुलींच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली गेली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
महाविद्यालय प्रशासनाने केले हात वर
दरम्यान सांगलीत ज्या महाविद्यालयात हा प्रकार घडला त्या कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान पटोले यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातली शिक्षण प्रणाली आणि सरकारमध्ये कोणीच कोणाचे ऐकत नाही. मुलींच्या शाळेत परिक्षेच्या नावाखाली छेडखानी चालली आहे. या घाणेरड्या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सरकारने त्यात लक्ष घातले पाहिजे याकडे पटोले यांनी वेधले.