
बिहार प्रमाणेच येथेही ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली.
नागपूर: बिहारनंतर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर आता सत्ताधारी काय निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र भाजपकडून आपली भूमिका काय असेल हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. बिहार प्रमाणेच येथेही ओबीसींची जनगणना करण्यात यावी, अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली.
बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसीच्या विविध जातींचा सर्वे करावा अशी मागणी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. ते म्हणाले की, “बिहार सरकारने ओबीसींच्या जनगणनेचे आकडे जाहीर केले आहे. मी बावनकुळे यांच्याकडे मागणी करतो की आधीच महाराष्ट्र विधानसभेने एकमुखाने ओबीसी आणि इतर जातीच्या गणण्याची मागणी केलेली आहे. बावनकुळे यांना विनंती आहे कि त्यांन सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधील विविध जातींचा सर्वे करून आकडे जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करावी.”
आशिष देशमुख यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केल्यानंतर त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, “बिहारचा जो रिपोर्ट आज आला आहे, त्यानंतर आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा सामाजिक आर्थिक स्टॅटिस्टिक डेटा जाहीर करावा. ओबीसींची संख्या किती आहे याचा डेटा राज्य सरकारने सर्वे तयार करून तो जाहीर करावा, यासंदर्भात आम्ही राज्य सरकारला विनंती करू.”