आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करु द्या. सरकार मात्र जनहिताचे निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
सातारा : शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला. मात्र अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यावरून विरोधक टीका करत आहेत. बिनखात्याचेच मंत्री हे यंदा १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतील असा टोला लगावण्यात येत आहे. या सर्वावर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करु द्या. सरकार मात्र जनहिताचे निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र खातेवाटप कधी होणार ? या प्रश्नाचं नेमकं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाही.
शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? हा प्रश्न विचारला जात होता. त्यानंतर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार ? हा प्रश्न विचारला जात होता. आता खातेवाटपाचे काय ? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
खातेवाटपाच्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांकडून आरोप हे होणारच. महत्वाचे निर्णय सरकारने घेतले असून प्रत्येक निर्णय हा स्टेप-बाय स्टेप हा घेतला जाणारच आहे. केवळ मुद्दा उपस्थित करुन राजकारण करणे हे योग्य नाही. गेल्या महिन्याभरात जनतेच्या हिताचे मोठे निर्णय झाले आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नसले तरी जनतेला ते माहिती आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांचे काम करु द्या सरकार आपल्या कामात व्यस्थ असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.