केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करा; संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या खासदारांना सूचना

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Annual Budget 2023-24) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदारांना विशेष सूचना केल्या.

    मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Annual Budget 2023-24) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदारांना विशेष सूचना केल्या. खासदार हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितला.

    मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्यातील खासदार यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याच्या हिताचे, सर्व सामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे प्रस्ताव केंद्र शासनाकडे असून त्यांना गती देण्यासाठी आपण एकदिलाने काम करू. त्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. प्रलंबित प्रस्ताव, प्रश्नांबाबत पाठपुरावा करतानाच, राज्याच्या विकासासाठी आणखी नवे, अभिनव प्रकल्प, उपक्रम, योजना यांची मांडणी व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

    आजच्या बैठकीत खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर झालेल्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी दोन महिन्यांनी पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक तो निधी वेळेवर मिळावा यासाठी आवश्यक ती उपयोगिता प्रमाणपत्र मुदतीत न पाठविण्यात यावीत. त्यामुळे मंत्रालयीन विविध विभागांच्या सचिवांनी याबाबत लक्ष घालावे आणि भविष्यात वेळीच उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भरीव निधी मिळत असून नुकतेच राज्याच्या नगरविकास विभागाच्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

    विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत : उपमुख्यमंत्री

    संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रस्ताव आणि प्रश्न मांडावेत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी यावेळी सांगितले. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासनाचा ५० टक्के वाटा न देण्याचा निर्णय आम्ही रद्द केला असून आता रेल्वे प्रकल्पांसाठी ५० टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहिर केले.

    खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळेवर द्यावे. त्यामुळे केंद्र शासनाकडे असलेला निधी मिळण्यास मदत होईल, सध्या केंद्राकडून १४०० कोटी रुपये मिळाले असून सर्वांनी वेळेत उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी खासदार गजानन किर्तीकर, सदाशिव मंडलिक, इम्तियाज जलील, धनंजय महाडिक, रामदास तडस, धैर्यशील माने, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, पुनम महाजन, डॉ. प्रितम मुंडे, नवनीत राणा, मनोज कोटक, संजय मंडलिक, प्रताप जाधव, डॉ. सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे, गोपाळ शेट्टी, हेमंत गोडसे, डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.