gopinath munde statue inaugaration

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

सिन्नर: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण (Gopinath Munde Statue Inauguration) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

याप्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतूद केली आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुंडेंचा वारसा पुढे नेऊ : गडकरी
लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पीडित, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्य पणास लावले. कृष्णा खोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.

समाजाला न्याय हीच मुंडेंना श्रद्धांजली
माजी मंत्री छगनराव भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहूजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच  गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

मुंडे आणि गडकरींची कामाची पद्धत सारखी -पंकजा मुंडे
माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. मुंडे आणि गडकरी यांची काम करण्याची पध्दत एकसारखी होती. या दोघे ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वासित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजच्या स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही. गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.