बार्शीतील शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून आ. राऊत यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट

बार्शी तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या मागील तीन महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ. राजेंद्र राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

    बार्शी : बार्शी तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या मागील तीन महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून आ. राजेंद्र राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी विनंतीही केली.

    बार्शी तालुक्यातील दहा मंडलांपैकी बार्शी व खांडवी या दोन मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. या दोन मंडळातील नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. नंतर उर्वरित आठ मंडळातील उपळे दुमाला व नारी या दोन मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. उर्वरित सहा मंडळातील सततच्या पावसाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे आठ मंडलांबाबत नुकसान भरपाई मदतीचा अहवाल दिला आहे.

    या उर्वरित आठ मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव गुप्ता यांची भेट घेतली असून याबाबत तालुक्यातील सद्यस्थितीचा पूर्ण आढावा त्यांच्यासमोर मांडला.

    संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकरीता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे व फळबागांची नुकसान भरपाई संदर्भात उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बैठक आयोजित केलेली असून लवकरच या बैठकीतून बार्शी तालुक्यासाठी आनंदाची बातमी मिळणार आहे असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.