सांगा जगायचं कसं? 12 हजार रूपये क्विंटल विकला जाणारा कापूस यंदा ७ हजारांवरच, अर्धा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून, शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं, काय म्हणाले शरद पवार?

गेल्या वर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात कापसाला 12 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. पण यंदा कापसाला सात हजारांचा भाव आहे.

    बुलढाणा : गेल्या वर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यात कापसाला 12 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. पण यंदा कापसाला सात हजारांचा भाव आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी रासायनिक खताचे भाव वाढले, मजूराच्या खर्चात वाढ झाली, किटकनाशक औषधीचे दर वाढले पण कापसाचे भाव वाढले नाहीत. यंदा मात्र कापसाला 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने कर्ज कसे फेडावं, याविवंचनेत शेतकरी आहे.

    कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

    कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची मजूरी सुद्धा निघत नाही, अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा आणि पुढील हंगामाची मशागत कशी करावी या पेचात कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे. कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच कर्जाच्या वसूलीसाठी सावकार अन् कापूस वेचणारे मजूरही मजूरीचे पैसे मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारावर येत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी यावर्षी डबघाईस आलेला आहे.

    शेतकरी मेटाकुटीला

    गेल्या तीन चार वर्षात कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नव्हता, पण गेल्या एक दोन वर्षांत कापसाला उच्चांकी दर मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु कापसाचे भाव वाढण्याऐवजी घटत गेले व आता व्यापारी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल कापसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च निघालाच नाही व उत्पादन घेण्यासाठी कर्ज काढले. ते कसे भरावे व मजूरांना त्यांची मजूरी कशी द्यावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.

    काय म्हणाले शरद पवार

    राज्यात कापूस, कांदा, साखर या उत्पादनांना योग्य भाव मिळत नसलव्याची नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील अर्ध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे, त्यांना योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत असल्याचं पवार म्हणालेत. उद्या कापूस प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर उतरले तर त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असंही पवारांनी स्पष्ट केलंय. केंद्रातील सरकार शेती, शेतकरी आणि शेतीची अर्थव्यवस्था याबाबत उदासीन असल्याची टीकाही त्यांनी केलीय.