वीजप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भरीव निधीची मागणी

खंडाळा तालुक्यातील वीजप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी,अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आली आहे.

    खंडाळा : खंडाळा तालुक्यातील वीजप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी,अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आली आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष देत महावितरण विभागाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.त्यामुळे विजेचा प्रश्न लवकरच मिटण्याची चिन्हं आहेत.

    तालुक्यातील वीजप्रश्नासाठी भरीव निधीची तरतुद व्हावी. याप्रमुख मागणीसह जेजुरी येथील अर्धवट दोन टॉवरचे काम लवकर मार्गी लावण्यात यावे.जेणे करून शिरवळ उपकेंद्र लोणंदला जोडण्यात येईल.शिरवळ येथील 132 के.वी. उपकेंद्रामध्ये तातडीने आयसोलेटर बसवणे, त्याचप्रमाणे 132 के.वी. उपकेंद्रामधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे. या कामासाठी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला आहे.

    वीजप्रश्नावर पुरुषोत्तम जाधव म्हणाले कि,खंडाळा तालुक्यात धोम बलकवडी व निरा देवधर या प्रकल्पाचे पाणी आले आहे.आता कुठे शेतकऱ्यांची प्रगती सुरु झाली आहे.मात्र महावितरणकडून विजेचा लपंडाव चालू आहे.त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.शेतीला वीज दिवसा असो किंवा रात्री,त्यातही अर्धवेळ वीज गायब असते. शेतीसाठी लागणारी वीज ही अतिमहत्त्वाचा प्रश्न असून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकरी वर्ग सोसत आहे.

    तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील 14 गावांसाठी सध्या 22 के.वी जवळे गावठाण ही एकच वाहिनी असून या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास परिसरातील 14 गावांमध्ये अंधार असतो.त्यामुळे लोहोम या ठिकाणी 33/22 के.वी. क्षमतेचे उपकेंद्र केंद्र सरकारच्या योजनेमध्ये प्रस्तावित असून सदर उपकेंद्रास तातडीने मंजुरी मिळावी,31/22 म्हावशी उपकेंद्रातील 5 एम.व्ही.ए. रोहित्राचा 10 एम.व्ही.ए. करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.