धनंजय मुंडेंना लातूर जिल्ह्यात फिरु देणार नाही, ठाकरे गटाचा इशारा, लातूरमधील नागरिक संतप्त

प्रस्तावित असलेले अनेक प्रकल्प आणि प्रोजेक्ट हे इतर जिल्ह्यात जाताना दिसत आहेत.

    धनंजय मुंडेंचा निषेध : मागील अनेक वर्षापासून होणार होणार अशी चर्चा असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूर ऐवजी बिडला झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध आहे. असे असताना प्राथमिकता लातूर ऐवजी बीडला देण्यात आली आहे. सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित होते. परंतु ते बीड जिल्ह्यामध्ये गेले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे बीड जिल्ह्यामध्ये मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता लातूरमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

    आज लातूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यामध्ये कुठेही फिरु देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्यास काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मराठवाड्यातील विकासासाठी विविध प्रकल्प राबवण्यात आले होते. मात्र, यात लातूरकरांना अक्षरशः वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या आहेत. इतर जिल्ह्यापेक्षा कमी निधी तर मिळालाच मात्र लातूरचा हक्क असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी आणि लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र बीडला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर लातूरमध्ये सक्षम राजकीय नेतृत्व अस्तित्वात नसल्या कारणाने प्रस्तावित असलेले अनेक प्रकल्प आणि प्रोजेक्ट हे इतर जिल्ह्यात जाताना दिसत आहेत. दादा भुसे हे कृषिमंत्री असताना लातूरला सोयाबीन परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र मंजूर करण्याबाबतची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने शासकीय पातळीवरुन हालचालही झाली होती. त्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे लातूर येथे आले होते. त्यांनीही सोयाबीन संशोधन केंद्र लातूर येथे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता नवीन सरकार विस्तारीकरणात राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे झाले आणि लातूरकरांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याच्या भावना ठाकरे गटाने व्यक्त केल्या आहेत.