
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची वाढती गोडी हीच त्यांची प्रेरणा बनली असून या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील अविनाश पाटील यांना पाठिंबा मिळत आहे.
धुळे : ज्ञान देण्याचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक वेगळं महत्त्व असतं मात्र, परिस्थिती अभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा शिक्षक स्व इच्छेने येणाऱ्या अडचणींवर मात करत ज्ञानदानाचा पवित्र काम करतो त्यावेळी तो शिक्षक संपूर्ण समाजासाठी आदर्शवत ठरत असतो. धुळे शहरातील आदर्श शाळेचे शिक्षक अविनाश पाटील हे अशाच पद्धतीने ज्ञानदानाचे पवित्र काम करीत असून, त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
धुळे शहरातील आदर्श माध्यमिक शाळेत उपशिक्षक पदावर काम करणारे अविनाश पाटील हे शाळाबाह्य मुलांची माहिती घेत असताना नकाणे गावाजवळील एका पाड्यावर राहणारा एक विद्यार्थी परिस्थिती अभावी शाळेत येऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच, या विद्यार्थ्याला शिकवून मोठे करण्याचे स्वप्न शिक्षक अविनाश पाटील यांनी पाहिले मात्र या पाड्यावर अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे विद्यार्थी शालेय शिक्षण घेऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले या विद्यार्थ्यांसाठी या पाड्यावरच शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
धुळे शहराजवळ असलेल्या नकाणे गावाजवळील एका आदिवासी पाड्यात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून याच भागात निसर्गाच्या सानिध्यात टेकडी वरची शाळा सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. या पाड्यावरील जवळपास २० पेक्षा अधिक मुले सध्या अविनाश पाटील यांच्याकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत, सुरुवातीला या विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल तसेच वही आणि पेन यांचा प्रश्न उभा राहिला मात्र हा प्रश्न आपल्या कामाच्या आड येऊ न देता कृतिशील शिक्षणावर भर देत मातीवरच झाडाच्या काडीच्या साहाय्याने अक्षरे गिरवण्यास या विद्यार्थ्यांकडून अविनाश पाटील यांनी सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची वाढती गोडी हीच त्यांची प्रेरणा बनली असून या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील अविनाश पाटील यांना पाठिंबा मिळत आहे.
रोज सकाळी आठ वाजता उघडणारी ही शाळा १० वाजेपर्यंत सुरू असते. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणाला डॉक्टर तर कुणाला इंजिनियर तर कोणाला पोलीस व्हायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात बाजारीकरण वाढत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे अविनाश पाटील हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक म्हणून आश्वासक वाटत आहे. नव्या पिढीसाठी संपूर्ण समाजासाठी आदर्शवत ठरले आहेत.