
धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे.
उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव आणि औरंगाबादचे (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे. हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर त्यांच्या या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर देत, त्यांना प्रक्रिया समजावून सांगितली आहे.
अंबादास दानवे यांनी काय सवाल केलाय?
हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद’, असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे.” असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे. दरम्यान, अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ट्विट शेअर करत उत्तर दिलं आहे.
फडणवीस काय म्हणाले ?
“अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही” असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर उत्तर देत नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.
अंबादास जी,
आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे. https://t.co/DyWaqjXlvO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023