
२०१७ साली तत्कालीन पालकमंत्री सन्मानीय एकनाथ शिंदे यांनी लवकरच दिव्याची डम्पिंग बंद केली जाणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर भंडार्ली येथे घनकचरा प्रकल्प मंजूर करून दिवेकरांना दिलेले वचन सत्यात उतरविले.
दिवा : सध्या आरोप करत असलेल्या माजी नगरसेविका जेव्हा सन २००० दिव्याचे डंपिग (Diva Dumping Ground) झाले तेव्हा त्या कुठे काम करीत होत्या हे तपासून पहावे. सुरुवातीला काही लोकांनी दिव्यामध्ये डंपिंगसाठी जागा देवून तेथे कचऱ्याचे ढीग उभारण्यासाठी एक प्रकारे मदतच केली आणि आज महापालिकेने (TMC) भंडार्ली (Bhandarli) येथे सुसज्ज असे डंपिंग उभारण्याचे प्रस्तावित केले आहे, या कामासाठी विरोधाला विरोध म्हणून आज हीच मंडळी विरोध करीत आहेत. तरी यांना नेमके काय साधायचे आहे असा सवाल माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केला आहे.
२०१७ साली तत्कालीन पालकमंत्री सन्मानीय एकनाथ शिंदे यांनी लवकरच दिव्याची डम्पिंग बंद केली जाणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर भंडार्ली येथे घनकचरा प्रकल्प मंजूर करून दिवेकरांना दिलेले वचन सत्यात उतरविले. सदरचा प्रकल्प सर्वसाधारण सभेत मंजुरी आला तेव्हा देखील याच मंडळींनी विरोध केला होता. सध्या आरोप करीत असलेल्या माजी नगरसेविका कोणत्या पक्षात होत्या याची माहिती घ्यावी.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिवेकरांना दिलेल्या शब्दानुसार भंडार्ली प्रकल्पावर ठाणे महानगर पालिकेने आतापर्यंत साडे पाच कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च केले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. तसेच भंडार्ली प्रकल्पासाठी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी पक्षाने गावकऱ्यांशी चर्चा करुन मध्यस्थी केली होती. पालिकेने सदर प्रकल्पाच्या देखभालीसाठी नुकतीच निविदा काढली असून दिव्यातील लवकरच बंद होवून दिवेकरांना मोकळा श्वास मिळणार आहे.
दिव्याचे डंपिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, दिव्यातील नगरसेवकांनी प्रयत्न केले होते. हीच बाब लक्षात घेऊन निव्वळ श्रेयासाठी काही मंडळी आंदोलन करुन केविलवाणा प्रयत्न करीत आहेत असे रमाकांत मढवी यांनी म्हटले आहे.
भंडार्ली प्रकल्प सुरू झाल्यावर दिव्यातील डम्पिंग बंद होणार व त्यांनतर निवडणुकीसाठी मुद्दा शिल्लक राहणार नाही हे लक्षात घेऊन दिव्यातील तथाकथित मंडळींनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांची दिशाभूल करून भंडार्ली प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न सुद्धा केले होते आणि आज हीच लोकं डम्पिंग बंद व्हावे म्हणून निव्वळ नौटंकी करत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना कायम लोकांसाठी काम करत असते दिव्यातील विरोधी पक्ष केवळ निवडणुका जवळ आल्या की अशी स्टंटबाजी करण्यासाठी बाहेर येतात असे रमाकांत मढवी यांनी म्हटले.
दिवेकर जनता असला ढोंगीपणा जाणून आहेत. दिव्यातील डम्पिंग बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर लवकरच डम्पिंग कायम स्वरूपी बंद होणार असल्याचे रमाकांत मढवी यांनी दिवावासीयांना विश्वास दिला आहे.