सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे आवश्यक : सीईओ स्वामी

सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक असल्याचे प्रतिपादन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.जिल्हा परिषद मुख्यलय परिसरात उमेद अभियानाच्या वतीने रानभाज्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाचे उद्घाटन सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

    सोलापूर : सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक असल्याचे प्रतिपादन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.जिल्हा परिषद मुख्यलय परिसरात उमेद अभियानाच्या वतीने रानभाज्या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवाचे उद्घाटन सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे फार महत्त्व आहे. खते व किटकनाशकांच्या वापरामुळे फळे, धान्य व भाजीपाला विषयुक्त होत असून त्या सेवन केल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात निसर्गतः उगवून येणाऱ्या रानभाज्या अमृतापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे रानभाज्यांची ओळख करून घ्या व सुदृढ आरोग्यासाठी त्यांचे मुबलक प्रमाणात सेवन करा. असे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले.

    रानभाज्यांची ओळख ग्रामीण भागातील लोकांना असते परंतु शहरी भागात या रानभाज्या सहसा कोणाला माहिती नसतात. शहरातील नागरिकांना या रानभाज्यांची ओळख व्हावी त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यदायी लाभ समजावेत म्हणून उमेद अभियानाच्या माध्यमातून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.

    या महोत्सवात दुपारी बारा ते तीन यावेळेत रानभाज्यांची पाककृती उपलब्ध असणार आहे. सर्वांनी येथील खाद्यपदार्थ विकत घेऊन खावे असे आवाहन स्वामी यांनी केले.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांनी भाजी खरेदी केली.

    यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, शिक्षणाधिकारी किरण लोहार, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता पाटबंधारे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता बांधकाम सुनील कटकधोंड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, उमेद अभिनयाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे आदींसह कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.