
गेल्या एक-दोन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या नापिकीने कर्जाचा डोंगर वाढला. यंदाही साल पडल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध प्राशन (Farmer Suicide) करून आत्महत्या केली. ही घटना गावालगत असलेल्या वडाळा शेत शिवारात रविवारी (ता. 8) उघडकीस आली.
आष्टी : गेल्या एक-दोन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या नापिकीने कर्जाचा डोंगर वाढला. यंदाही साल पडल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध प्राशन (Farmer Suicide) करून आत्महत्या केली. ही घटना गावालगत असलेल्या वडाळा शेत शिवारात रविवारी (ता. 8) उघडकीस आली.
पुरुषोत्तम विश्वनाथ वरकड (वय 52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील अल्प भूधारक शेतकरी पुरुषोत्तम विश्वनाथ वरकड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. पुरुषोत्तम वरकड हे अतिशय मेहनती होते. घरच्या अडीच एकर शेतीमध्ये मुलींचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांनी 20 एकर शेती भाड्याने घेतली होती. त्यांनी शेतीच्या लागवडीसाठी बँकेसह खाजगी सावकारांकडून लाखोंचे कर्ज घेतले होते. मात्र, दरसालच्या नापिकेने ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यात दोन मुलींच्या लग्नाचे कर्ज व मुलाचे शिक्षण अशातच त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढत गेल्याने ते नेहमी चिंताग्रस्त असायचे.
याच नैराश्येत गेलेल्या पुरुषोत्तम यांनी भाड्याने केलेल्या देशपांडे यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी टाहो फोडला. आष्टी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.