
अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे एका लग्न सोहळ्याच्या (Wedding) कार्यक्रमात वरातीच्या पंगतीत जेवल्यानंतर 27 जणांची प्रकृती बिघडली. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
अमरावती: सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. लग्नातलं जेवण हा प्रत्येक लग्नात चर्चेचा विषय असतो. पण अमरावतीतील एक लग्नातील जेवणामुळे धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे हा प्रकार घडला आहे. लग्नाच्या वरातीतले लोक पंगतीत जेवल्यानंतर त्यांना विषबाधा (Amravati Food Poisoning)झाल्याची माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 27 जणांना या लग्नातील जेवणामुळे विषबाधा झाली आहे. (Amravati News)
दरम्यान विषबाधा झालेल्या रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सगळ्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे एका लग्न सोहळ्याच्या (Wedding) कार्यक्रमात वरातीच्या पंगतीत जेवल्यानंतर 27 जणांची प्रकृती बिघडली. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. पोटदुखी, मळमळ,जुलाब होऊ लागल्याने सर्वांना तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तपासणी केली असता जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या सर्वांवर उपचार सुरू असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णांवर काही तास रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आमदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात रुग्णांची विचारपूस केली. दरम्यान, या प्रकारानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.