
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते.
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा धनगर समाज हे रस्त्यावर आले नसते. परंतु राज्यकर्त्यांनी त्यावेळी ऐकले नाही. बाळासाहेबांच्या विचारांची जर पूर्वीच अंमलबजावणी झाली असती तर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाली नसती, असे मत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्यात कदम बाेलत हाेते. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार रामदास कदम यांना प्रदान करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे उपस्थित होते. कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव , अॅड.एस.के.जैन, फत्तेचंद रांका, विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पुरस्काराने गाैरविण्यात अाले.
आजचे राजकारण अतिशय गलिच्छ झाल्याची चिंता व्यक्त करीत कदम म्हणाले, ‘‘ सध्याच्या परीस्थितीत सकारात्मक विचारांचे आणि सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येणे, ही समाजाची आणि काळाची गरज आहे.’’
एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘तरुणांनी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार अंगीकारले पाहिजेत. संकटाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. सकारात्मक विचारांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. मनामध्ये निराशा न आणता प्रामाणिकपणे मार्गक्रमण करत राहिलो तर यश निश्चितच मिळते.’’