शांतीविद्या ज्ञानसंवर्धन संस्था ही निरपेक्ष भावनेने कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत समाजातील निराधार व गरजू रुग्णांना निशुल्क वैद्यकीय उपकरण उपलब्ध करून दिले जाते.
हातकणंगले : बाहुबली तालुका हातकणंगले येथे शांतीविद्या ज्ञानसंवर्धन संस्था जयसिंगपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऐतिहासिक कुंडलपूर महामहोत्सव २०२२ कार्यक्रम पार्श्वभूमीवर कुंडलपूर येथे पूजेसाठी गेलेल्या स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा बाहुबली येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूर माजी नगराध्यक्ष स्वरूपा यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, सावकर मादनाईक, डी. सी. पाटील, बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. तसेच कार्यक्रमप्रसंगी कुंडलपूर स्वयंसेवकांचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शांतीविद्या ज्ञानसंवर्धन संस्था ही निरपेक्ष भावनेने कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत समाजातील निराधार व गरजू रुग्णांना निशुल्क वैद्यकीय उपकरण उपलब्ध करून दिले जाते. तसेच सदर संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त परिस्थितीत समाज निधीतून ३४४ लोकांना घरांचे बांधकाम करून देण्यात आले आहे. त्याच पद्धतीने कोरोना कालावधीत मागेल त्याला मदत करून दिली आहे.
सदर संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान स्कॉलरशिप तसेच निराधार साडेतीनशे महिलांना महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून पेन्शन दिली जात आहे. सदर संस्थेने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून सदर वटवृक्षाच्या छायेखाली आज आज हजारो स्वयंसेवक तन-मन-धनाने कार्य करत आहेत, असे उद्गार मुख्य संघटक तात्या भैयाजी यांनी काढले.