विदर्भासह अमरावती जिल्हयामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतपिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
अमरावती : विदर्भासह अमरावती जिल्हयामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतपिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्या वतीने ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ४० वर्षात असा पाऊस झाला नाही. शासनाचे पर्जन्यमापक यंत्रे ही सदोष असल्याचा आरोपही ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. जिल्हयामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा, उडीद, मूग या शेतपिकांसह फळबागाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक मंडळ क्षेत्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच काही ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरीक व पशुधन पालकांना सरसकट मदत द्यावी. नदी व नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने जमीन खरवडून निघाली आहे. शेतीमध्ये मोठया प्रमाणात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली.
पुढे त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील तिवसा व नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी व महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे संत्रा व फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची नोंद ही शासन व प्रशासनाला निरंक पाठविल्याने तिवसा व नांदगाव तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या नुकसानीचा व नुकसान भरपाई मिळण्याचा अहवाल शासनाला तातडीने पाठवण्यात यावा, तूर पिकाचे नुकसानीचे सुद्धा पंचनामे व्हावेत. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भिंतीची पडझड होत, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच सर्व सामान्यांना सरसकट मदत मिळवून द्यावी. अन्यथा शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आम्ही अधिक आक्रमतेने लढा उभारू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.