अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची उडाली धांदल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारले. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मात्र पवारांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे.

    मुंबई: राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज दुसरा दिवस आहे.  आज सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे, असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारले. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना मात्र पवारांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे.

    अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना विचारली होती. ही माहिती आरोग्यमंत्र्यांकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि प्रश्न उत्तरासाठी सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला. शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागला.

    पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना हत्तीरोग झाल्याचे समोर आले. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप आणि अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता.