
महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा.”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्रमक पद्धतीत आपली भूमिका मांडली. त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्र कोल्हापूर आणि मुंबईच्या चर्चगेट येथे घडलेल्या दोन घटनांमुळे सुन्न झाला आहे. या दोन घटनांवरुन नाना पटोले यांनी सरकारवर अतिशय कडक शब्दांत ताशेरे ओढले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“महाराष्ट्रातील तथाकथिक काही संघटना अशी काही घटना घडली की पुन्हा आग टाकण्याचा प्रयत्न करतात. संबंधित घटनेत तेल, पेट्रोल ओतण्यात काम केलं जातं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी खपवून घेणार नाही. कोणाचं खपवून घेणार नाही? राज्यात ज्या सातत्याने धार्मिक आणि जातीय तणाव घडत आहेत ते थांबण्याची जबाबदारी सरकारची आहे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सुनावलं.