
देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या मंदिराची देखरेख न करता हे पुजारी पळून जातील असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परभणीत केले आहे.
परभणी : देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या मंदिराची देखरेख न करता हे पुजारी पळून जातील असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परभणीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (19 नोव्हेंबर) आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहा फूट उंचीच्या 50 बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विजय वडेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. याचवेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेल्या बौध्द धर्मावर वक्तव्य केलं.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. आजवर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे. परंतु सध्या दिल्लीत गोपीचंद, फेकुचंद, तोरडमल हे लोक बसले आहेत. या लोकांचा विचार देश तोडणारा आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांनाही लक्ष केले. मंदिरातील दान पेट्या काढून घेतल्यास, मंदिरात असलेले पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.