
'हिंदूचे सरकार' अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारसमोर उपस्थित केला.
पुणे : ‘हिंदूचे सरकार’ अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारसमोर उपस्थित केला. गेल्या काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली.
गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून, निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सव काळातील ५ दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगीही सरकारने दिली होती. असे असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे आमदार धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब आमराळे, संजय बालगुडे, भाऊ करपे, यश वाघमारे, प्रशांत सुरवसे, रोहन सुरवसे यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
उत्सव आयोजित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर चुकीची कारणे पुढे करून सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी निर्बंध उठवलेले असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना नाहक त्रास देणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, असे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. उत्सव सप्टेंबर महिन्यात झाला. त्यावेळी पोलिसांनी अडवले नाही. कारवाई केली नाही. नोटीस दिली नाही आणि आता नोव्हेंबर महिन्यात कारवाई केली जात आहे. ती तातडीने थांबवावी, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.