
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला होता.
मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तिन्ही घटक पक्षांनी जागावाटपाच्या चर्चेसाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र काँग्रेसने (Congress) जाहीर केलेल्या या समन्वय समितीमधील नावामुळे पक्षातंर्गत वादाची ठिणगी पडली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी रणनीती ठरवत आहे. मात्र रणनीती निश्चित करतानाच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत कुणाला स्थान द्यायचं यावरुन काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंकडून (Nana Patole) तीन नावं जाहीर करण्यात आली. मात्र, परस्पर नावे ठरवल्याचं केंद्रातील वरिष्ठांना आवडलं नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे समन्वय समितीसाठी आधी जाहीर झालेली नावे बदलली जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र ही नावे निश्चित करताना महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना न दिल्याने अवघ्या 48 तासांतच ती रद्द करण्याचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ही यादी रद्द करताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना यासंदर्भात जाबही विचारण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे चेहरेही समन्वय समितीत त्यांच्या नावांचा विचार न झाल्याने नाराज आहेत.
लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसने तीन जणांची नावे निश्चित केली होती. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान आणि आमदार बसवराज पाटील यांची निवड केली होती. मात्र, या यादीत विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार करण्यात न आल्याने काँग्रेसच्या एका गटामध्ये नाराजी आहे.