
एकिकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर पत्रकार परिषदेमध्ये जोरदार टीका केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवा. तसेच कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करा, यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जितेंद्र आव्हाड यांनी निवेदन दिले आहे.
पुढे ते म्हणाले, एकिकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. रामदेव बाबाला धार्मिक विषयावर महत्व देणे चुकीचे ठरेल. पण, मोक्ष देणार म्हणजे आम्हाला मारणार का? सनातन धर्माची बाजू घेणाऱ्या लोकांना काही प्रश्न आहेत, त्याची त्यांनी उत्तरे द्यावित असे आव्हाड म्हणाले.