
तुम्ही मोबाईलचा वापर चांगल्या उपयोगी माहिती मिळवण्यासाठी करा. मन शांत ठेवून अभ्यास करा. भविष्यात चांगल्या गोष्टी करा. चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि यशस्वी नागरिक बना.
कल्याण – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कल्याण जिल्हा कारागृह परिसर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाच्या इयत्ता नववीचे विद्यार्थी, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शाळेचे शिक्षक गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, नयना वाबळे, संगीता महाजन, शोभा देशमुख, उर्मिला साबळे व गणेश पालांडे यांनी कल्याण जिल्हा कारागृहाला भेट देत परिसर स्वच्छ केला. सोबत कारागृह अधीक्षक आर. आर. भोसले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी जे. ए. काळे सहाय्यक वरिष्ठ तुरुंग अधिकारी एस. सी. कुंभार आणि त्यांचे सहकारी यांनी देखील विद्यार्थ्यांना साथ देत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक राजाराम भोसले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कारागृह हे सुधार गृह आहे. आलेल्या आरोपींना येथे सुधारण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळी शिक्षा दिली जाते. तुम्हा विद्यार्थ्यांवर भविष्यात अशी वेळ येऊ नये. मोबाईल मुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही मोबाईलचा वापर चांगल्या उपयोगी माहिती मिळवण्यासाठी करा. मन शांत ठेवून अभ्यास करा. भविष्यात चांगल्या गोष्टी करा. चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि यशस्वी नागरिक बना.
मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले विद्यार्थी भावी नागरिक आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ नये. कळत नकळत अनुचित प्रकार घडला तर कारागृहात कशाप्रकारे शिक्षा होत असते क्षेत्रभेट अभ्यास व स्वच्छ भारत मिशन निमित्त कल्याण जिल्हा कारागृहाला भेट देत विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.