कराडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद , प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; लम्पी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर  या शेजारील जिल्हयात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

    कराड: गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर  या शेजारील जिल्हयात लंपी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. तसेच सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी लंपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

    कराड येथे आठवड्यातील दर गुरुवारी मोठा बाजार भरतो. यामध्ये कराड तालुक्यासह लगतच्या पाटण, सातारा, माण, खटाव व सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव व अन्य तालुके आणि लगतच्या कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे जनावरे खरेदी-विक्रीसाठी कराडच्या आठवडी बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. यामध्ये इतर पाळीव जनावरांसह गोवर्गीय जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते.

    सध्या कराड तालुका व सातारा जिल्ह्यासह लगतच्या सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्हयात पाळीव जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेशही आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

    तालुक्यातील दोन जनावरांचा मृत्यू
    दरम्यान, गतवर्षीही लम्पी या जनावरांमधील चर्म रोगाच्या प्रदुर्भावामुळे कराड तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामधून आताकुठे शेतकरी वर्ग सावरताना दिसत होते. परंतु, पुन्हा यावर्षी पाळीव जनावरांमध्ये पुन्हा लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले असून या रोगाने कराड तालुक्यातील दोन जनावरांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा
    पशूपालक शेतकऱ्यांनी न घाबरता जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, पाळीव जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी, लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने प्रथोमोपचार करावेत, जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी अथवा नजीकच्या पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.