
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी देशातील पहिल्या सहकार परिषदेत (Sahakar Parishad) सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
अहमदनगर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी अहमदनगर(Ahmadnagar) जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत (Sahakar Parishad) सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोदी सरकारने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर केंद्रात सहकार मंत्रालय का काढलं याचं कारण स्पष्ट केलं.
अमित शहा म्हणाले, “विठ्ठलराव विखे पाटलांनी दूरदृष्टीतून शेतकऱ्यांच्या विकासासाठी साखर कारखाना सुरू केला. हा साखर कारखाना आजही सहकारी पद्धतीने सुरू आहे याचा मला आनंद वाटतो. कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवला आहे आणि तो व्यवस्थितपणे चालवत आहेत याचा मला खूप आनंद आहे. आपला प्रेरणा स्त्रोत जपला गेलाय.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राने सहकारी चळवळीत जे योगदान दिलंय त्याची आठवण करावी लागेल. १९२३ मध्ये लोणीत सहकारी पतपेढी तयार करण्यात आली. त्यानंतर सहकारी मिल तयार झाली. हे प्रवरानगर सहकाराशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी सहकाराची काशी आहे. प्रवरा साखर कारखान्याने अनेक कामं केली. चांगलं प्रशासन असेल तर वर्षानुवर्षे सहकारी संस्था कशा व्यवस्थित चालतात याचं हे उदाहरण आहे.”
अमित शहा म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय आहे. सहकार मंत्रालयाची गरज काय असं विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के गहू, २० टक्के तांदुळाची खरेदी सहकार क्षेत्र करतं. २५ टक्के खतांचं उत्पादन आणि वितरण दोन्ही सहकाराच्या माध्यमातून होतं.”
राज्यस्तरीय सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री श्री. अमित शाह जी यांच्या प्रमुख उपस्थितित. https://t.co/bFdzXwTzUN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 18, 2021
अमित शहांच्या उपस्थितीतच देवेंद्र फडणवीसांनी स्टेजवरून टोलेबाजी केली. “देशात नरेंद्र मोदींचं आणि महाराष्ट्रात आमचं सरकार आलं, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधलं काय कळतं? आता सहकारचं काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
विखे-पाटील यावेळी म्हणाले की, मधल्या काळात सहकार सहकार चळवळीची पीछेहाट झाली आहे. मात्र, आता आपण सहकार मंत्री झाल्याने नवी संजीवनी मिळेल, असा आशावाद त्यांनी अमित शहा यांच्याकडे पाहून व्यक्त केला. राज्यातील सहकारी कारखानदारीचे खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकांनी खासगी कारखाने काढले आणि सहकाराला दोष दिला, असे म्हणत त्यांनी नाव न घेता टोलेबाजी केली.