
जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत अनेक रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्याचे समजताच रुग्णलायातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळात दहा रुग्णांना प्राण गमवावे लागले. आगीचे वृत्त कळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले?
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला सकाळी भीषण आग लागली. रुग्णालयातील आयसीयू विभागातच ही आग लागली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत अनेक रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्याचे समजताच रुग्णलायातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळात दहा रुग्णांना प्राण गमवावे लागले. आगीचे वृत्त कळताच स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.