महानंदाला चांगले दिवस येणार : रणजितसिंह देशमुख

केंद्रीय रक्षा मंत्रालयाचा महानंद बरोबर दूध खरेदीचा करार

संगमनेर  : सहकारी दूध संघांच्या संकटाच्या काळात मदतीला धावलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला चांगले दिवस यायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महानंद दूध संघाने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. शासनाने आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याचे काम महानंदला दिले आहे. लवकरच आरे चे उत्पादने बनवण्यास महानंद सुरुवात करणार असल्याचे महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दुग्धविकास मंत्री सुनील केदार व महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महानंद व राज्यातील सहकारी दूध संघांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.संपूर्ण जगावर थैमान घातलेल्या कोरोना काळात देशाला लॉकडाउनचा सामना करावा लागला.अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती.त्या कालखंडात दूध संघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.परंतु अश्या परिस्थिती महाविकास आघाडी सरकार शेतकरी व दुध संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या मुळे सहकार क्षेत्राला उभारी मिळाली.त्यातच राज्य सहकारी दूध संघाची आर्थिक स्थिती सुधरवण्यासाठी राज्य शासनाच्या आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याची परवानगी व आरे चे मुंबईमधील स्टॉल महानंदला मिळाल्यापासून महानंद’ची आर्थिक उलाढाल वाढणारआहे.महानंदच्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री संपूर्ण राज्यभर करण्यासाठी दूध विक्री स्टॉल ची लवकरच निर्मिती केली जाणार आहे.

महानंदचे दुध व दुग्धजन्य उत्पादने गुणवत्तापूर्ण व उच्चप्रतीचे असल्यामुळे  सर्वसामान्य ग्राहकांना परवडणार्‍या किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे महानंद’ची उत्पादने अधिकच लोकप्रिय ठरले आहे. महानंदचे अतिरिक्त दुधाची बनलेली दूध भुकटी राज्य शासनाच्या अटल अमृत आहार योजनेअंतर्गत व बालकल्याण आदिवासी विभागामार्फत योजनेत समाविष्ट सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. महानंद व केंद्रीय रक्षा मंत्रालय यांच्यात करार झाला असून भारतीय सैन्याला दूध पुरवठा महानंदने सुरू केला आहे. महानंदची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.