त्र्यंबकेश्वर तालुक्यात लसीकरणाबाबत दाैरा ; डॉ. पवार, फडणवीसांनी केली जनजागृती

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश आदिवासी भागात काेराेना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे या परिसरात लस घेण्यासाठी लवकर कुणी तयार हाेत नाही. ही प्रशासनासमाेरची माेठी अडचण आहे. प्रशासनातर्फे अनेक माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात आली आहे; तरी त्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश आलेले दिसत नाही.

    नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आता लसीकरणापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक गावातील लोकांची यादी तयार करण्यात येत आहे.

    यांचा सहभाग
    प्रत्येक गावात करोना प्रतिबंधक लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरणाच्या टीमने घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.

    लाभ घ्या : डाॅ. पवार
    प्रत्यक्ष लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाबद्दल जनजागृती करून सर्व स्तरावर लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भारती पवार व देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार प्रीतम मुंडे यांनी गावातील घरांमध्ये जाऊन लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली. ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ प्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करून जिल्ह्याचे शंभर टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    गैरसमजामुळे अडचण
    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतांश आदिवासी भागात काेराेना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे या परिसरात लस घेण्यासाठी लवकर कुणी तयार हाेत नाही. ही प्रशासनासमाेरची माेठी अडचण आहे. प्रशासनातर्फे अनेक माध्यमातून याबाबत जनजागृती करण्यात आली आहे; तरी त्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे फडणवीस आणि डाॅ. भारती पवार यांनी केलेल्या आवाहनामुळे तरी नागरिक लस घेण्यास पुढे येतील, अशी आराेग्य विभागाला अपेक्षा आहे.

    लसीकरणाचे लक्ष्य
    नाेव्हेंबरअखेरपर्यंत पहिल्या डाेसचे शंभर टक्के लसीकरण हाेणे गरजेचे असल्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. महिनाअखेरपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य आता आराेग्य विभागापुढे आहे. त्यामुळे आराेग्य विभाग वाडी-वस्त्यावर जाऊन जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रबाेधन करत आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.