भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी धुलीवंदनाच्या सणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले. होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका त्यांनी केली.
(Mumbai). भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी धुलीवंदनाच्या सणावरून ठाकरे सरकारला लक्ष्य केले. होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका त्यांनी केली. शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन मुंबई अतुल भातखळकर यांनी केले.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकार मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर यांनी दिले.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार. pic.twitter.com/WVDfdCJORw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का; आम्ही होळी घरामध्ये पेटवायची का?
ठाकरे सरकार फक्त हिंदू सणांनाच आडकाठी का करते, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन होळीचा सण साजरा करण्यात काय गैर आहे? इतर धर्माच्या लोकांच्या सणांना परवानगी दिली जाते. ते लोक कोरोनाचे नातेवाईक आहेत का, याचे उत्तर वसुली सरकारने द्यावे, अशी टीका राम कदम यांनी केली.
राम कदम यांनी रविवारी ट्विट करत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली. धुलिवंदनाच्यावेळी गर्दी होते, एकमेकांना रंग लावताना स्पर्श होतो. त्यामुळे धुलिवंदनावर घालण्यात आलेले निर्बंध मी समजू शकतो. पण होळी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे घराबाहेर पेटवू शकत नाही, असे ठाकरे सरकार म्हणते. मग आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का? ठाकरे सरकारची अक्कल कुठे गेली आहे, असा सवालही राम कदम यांनी विचारला.