शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करता आले नाही; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टिका

महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचे शेपुट दबले आहे म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय देण्याचे सोडाच शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करता आले नाही, उलट आपले हिंदुत्व कॉंग्रेसच्या खुंटीला टांगून राममंदीराच्या निर्माणात उणीवा शोधल्या जात आहेत. अश्या शब्दात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यानी सामनाचे कार्यकारी संपादक खा संजय राऊत यांना खुले पत्र पाठवून जोरदार टिका केली आहे.

    मुंबई : महाविकास आघाडीच्या दगडाखाली वाघाचे शेपुट दबले आहे म्हणून त्यांना बहुजन समाजाला न्याय देण्याचे सोडाच शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करता आले नाही, उलट आपले हिंदुत्व कॉंग्रेसच्या खुंटीला टांगून राममंदीराच्या निर्माणात उणीवा शोधल्या जात आहेत. अश्या शब्दात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यानी सामनाचे कार्यकारी संपादक खा संजय राऊत यांना खुले पत्र पाठवून जोरदार टिका केली आहे.

    फडणवीसांच्या नेतृत्वगुणांबाबत उपरती

    या पत्रांच्या सुरुवातीलाच श्रीमती वाघ यानी म्हटले आहे की शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मी आपले जाहीर आभार मानते. “मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस यांच्याकडेच आहे. फडणवीस हे चतुर व चाणाक्ष नेते आहेत.”असा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे. उशीरा का होईना पण फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली,हेही नसे थोडके.

    आपण पाठीत खंजीर खुपसला

    त्यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व प्रश्न सोडविण्याची चावी फडणवीस यांच्याकडेच आहे, याचे भान शिवसेनेला २०१९ मध्येच झाले असते तर फडणवीसच पुन्हा युतीचे मुख्यमंत्री झाले असते आणि आज महाराष्ट्राच्या इज्जतीची जी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती टांगली गेली नसती. मात्र त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री करून युतीचे सरकार पुन्हा आणण्याऐवजी आपण पाठीत खंजीर खुपसला, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आपल्या त्या एका कर्तृत्ववान नेत्याला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा आनंद आपल्याला मिळाला असेलच, पण काँग्रेस व राष्ट्रवादीला कायम दूर ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वाटेल? याचा क्षणभरही विचार केला असता तर महाआघाडीचा प्रयोग आपण केला नसता.

    खडसेंची पद न देता बोळवण

    त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावईशोध आपण लावला आहे. खडसे यांना जर खरेच त्यांचे पंख कापल्या गेल्याचे वाटत होते आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला व राष्ट्रवादीच्या तंबूत ते दाखल झाले. तर तेथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसत आहे. खडसेंच्या सन्मानाची आपल्याला इतकीच चिंता असेल तर सिल्व्हर ओकवर आपले वजन वापरून खडसे यांचे चांगले पुनर्वसन आपण करावे, अशी आपणास विनंती आहे. शिवसेनेत निष्ठावंतांचे हाल झाल्याची उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेतच.

    सोनिया सेनेचे मंत्री मोर्चे काढत होते

    चित्रा वाघ यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे की, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करुन ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला टिकवायचे होते, तेव्हा सोनिया सेनेचे मंत्री रस्त्यावर उतरुन मोर्चे काढत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, ही बाब लपून राहिलेली नाही. सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ घेत जो काही घोळ घातला,त्याचे परिणाम आज ओबीसी समाज भोगत आहे.  आमच्या हाती सत्तासूत्रे द्या, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण देतो हा फडणवीस यांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास ओबीसींच्या प्रश्नांबाबत त्यांना असलेल्या सखोल ज्ञानातून आणि ओबीसींप्रति त्यांच्या मनात असलेल्या कळवळ्यातून आलेला आहे. ओबीसी बांधवांमध्ये राहूनच त्यांनी आपल्या राजकारणाचा श्री गणेशा केला आणि ओबीसी समाजाने साथ दिल्यानेच इथवर आलो ,अशी कृतज्ञता फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली आहे.