आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्याचं आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं. परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही. प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं. सगळंच कन्फ्युजन आहे, काही दलाल बाजारात आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबई : आरोग्य विगातील परीक्षा रद्द करण्याच्य निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा घेतल्यमुळं सर्व स्तरातून संतापाची लाट उसळत आहे. या विभागातील क आणि ड वर्गासाठी २५ आणि २६ सप्टेंबरला होणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती, विद्यार्थ्यांना ऐनवेळी काल रात्री मेसेज आणि मेलद्वारे कळवण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आयटी कंपनीकडे बोट दाखवलं आहे. तसंच झाल्या प्रकारामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्याचं आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं. परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही. प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं. सगळंच कन्फ्युजन आहे, काही दलाल बाजारात आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे ५, १० ते १५ लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या प्रकरणाची १०० टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राजेश टोपे यांची माफी
दरम्यान झालेल्या सर्व प्रकारामुळं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात होते. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.