राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा – नाना पटोले

‘राफेल’ सौद्यात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? आणि देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या ‘डिल’ कोणी केल्या आणि त्यासाठी ‘ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत.

    मुंबई : देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अमित शाह यांना दिले आहे.

    पटोले म्हणाले की, ‘डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या चांगल्या योजना स्वतःच्या नावावर खपवून बिनदिक्कतपणे खोटे बोलणे हे भाजपाची पद्धतच आहे. पण त्या योजनेचा शब्दच्छल करत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर टीका करणारा भारतीय जनता पक्षच खऱ्या अर्थाने या देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’ आहे.

    ‘राफेल’ सौद्यात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? आणि देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या ‘डिल’ कोणी केल्या आणि त्यासाठी ‘ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत.

    महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात हे अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सत्तेच्या गुर्मीत असणारेच अशी वक्तव्ये करतात. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्रातील भाजपा सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, मग पहा भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे हे तुम्हाला कळेल, असे प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिले आहे.