महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक; काँग्रेस आज आपली भूमिका स्पष्ट करणार

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. यात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

  • शिवसेना-राष्ट्रवादीची कोंडी, काँग्रेस झाली अलर्ट; हायकमांडने दिले नवे आदेश

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे (Param Bir Singh Letter) महाविकास आघाडीच्या (MVA Goverment) गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळेच राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. यात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. याच पाश्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी एचके पाटील (HK Patil) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील राजकीय घडामोडी च्या संदर्भात चर्चा केली आहे.

काँग्रेस हायकमांडने राज्यातील राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने एक रिपोर्ट सादर करण्याची सूचना देखील या बैठकीत केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये मनसुख हिरेन मृत्यू या प्रकरणावरून मोठं शीतयुद्ध सुरू आहे. एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या देखील सुरू असल्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्यात काँग्रेसने नेमकी काय भूमिका घ्यावी यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यात यापूर्वी संजय राठोड प्रकरणावरून शिवसेनेची राजकीय कोंडी झाली होती. आता मनसुख हिरेन आणि सचिन वाझे या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची राजकीय कोंडी झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारची प्रतिमा स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.

तसंच भाजप विरोधकांकडून वारंवार जी जोरदार टीका होती त्याला प्रत्युत्तर द्यावं, अशी स्वरूपाची भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतल्याचे समजते. पुढील काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने काँग्रेसची भूमिका काय असावी याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

काँग्रेस पक्षाकडे या सरकारमध्ये तशी पाहिली तर फार मोठी खाती नाहीत. त्यात आता गृह खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून स्वतःची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही समजते.

भाजपाला प्रत्युत्तर देणे इतकेच गरजेचं असलं तरी सरकारची प्रतिमा ही महत्त्वाची आहे, असं मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले या नेत्याच्या प्रतिक्रियांवरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होत आहे.