
वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी आज राजीनामा दिला(Mumbai: A baby burnt in a cylinder blast was tormented for an hour; BJP alleges death due to untimely treatment).
मुंबई : वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी आज राजीनामा दिला(Mumbai: A baby burnt in a cylinder blast was tormented for an hour; BJP alleges death due to untimely treatment).
पीडित कुटुंबीयांना २५ लाख देण्याची मागणीही भाजपाने केली आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार योगेश सागर, आमदार अमित साटम, पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी प्रकाराची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णसेवेत अक्षम्य हेळसांड, दुर्लक्ष व गोल्डन आवरमध्ये विलंब झाल्याचे मान्य केले. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने मृत बालकाच्या नातेवाईकांना रुपये पंचवीस लाख नुकसानभरपाई द्यावी आणि सदर घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील तज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.
पेंग्विनवर उधळपट्टी; जनता वाऱ्यावर
मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी ४५०० कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही नायर रुग्णालयाचे प्रशासन आणि डॉक्टरांचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या ४५ मिनिटांत डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे एका दुर्दैवी चिमुकल्याचा अंत होणे ही अतिशय खेदाची बाब आहे. एकीकडे केवळ युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी, पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज रु.१.५ लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही ही बाब तमाम मुंबईकरांसाठी दुर्दैवी असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही फिरकलेसुद्धा नाहीत; साधी दखलही घेतली नाही. प्रशासनाचे व सत्ताधार्यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे अशी तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे गटनेते शिंदे यांनी दिली.