टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य

जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन ने केले.

  • पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई :  टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर  मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे कौतूक केले तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही ही दिली.

२२ मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमात  राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान,श्रीमती किरण राव,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन ने केले. यातली प्रयोगशीलता समजून सांगितली.  पाण्याचा जमीनीखालचा सातबारा कसा मोजायचा हे समजावून सांगितले.  शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचा असतो. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याचे सुराज्यात रुपांतर करतांना  वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यातूनच  अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पावसाचे वाहून जाणारे पाणी  धरणे, कालवे या माध्यमातून साठवतांना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन करण्याची तयारी ठेवावी लागते. तीच तयारी पाणी फाऊंडेशन ने केली, गावक-यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.

दक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी

कोरोना ने पुन्हा खुप मोठ्याप्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्वाच्या गोष्टींवर काम करावे,  गावात कुणी विना मास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसूत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कृषी विभागाच्या योजनांचे ही बळ देणार- कृषी मंत्री

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकेल ते पिकेल योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती दिली. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांचे बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही ते म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.

पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज- गडाख

जलसंधारण मंत्री श्री. गडाख यांनी ६० टक्के महाराष्ट्र जिरायती असून तिथे पाणलोटाची काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी फाऊंडेशनचे काम खुप महत्वाचे असल्याचे म्हटले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगतांना त्यांनी शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्यादिशेने काम सुरु झाल्याची माहिती ही दिली.

खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करणार- अमीर खान

यावेळी बोलतांना अमीर खान म्हणाले की, पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त ९०० गावात काम करत असल्याचेही ते म्हणाले.

सहा विषयांवर लक्ष केंद्रीत

यावेळी श्रीमती किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनी ही आपले या लोकचळवळीतील अनुभव सांगितले तसेच मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन, पौष्टिक गवत संवर्धन, वृक्ष लागवड व प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत वाढवणे या सहा महत्वाच्या उद्दिष्टांवर आता पाणी फाऊंडेशन काम करत असल्याची माहिती ही दिली.